काहीबाही

काहीबाही ८ – पत्र

मनाच्या आचारसंहितेत, शब्दांना हाताशी धरून भावनांनी बंडखोरी केली. अभ्रकासारख्या पांढऱ्याशुभ्र कागदावर रक्तरंजित आंदोलनं केली. वाळूत पाऊलांचे ठसे उमटावेत तशी अभ्रकावर चित्रविचित्र पण एकसंध नक्षी तयार झाली, भावनांच्या आणि शब्दांच्या पाउलांची.
मी आभाळभरून प्रयत्न केले तरी भावनांची बंडखोरी मोडणं मला शक्य झालं नाही, पण मी प्रयत्न सोडले नाहीत आणि त्यातच त्यांच्या बंडखोरीला जुन्या आठवणींची नवी कुमक मिळाली.
या द्वंद्वातच माझा पराभव झाला आणि या साऱ्यांची साक्ष असलेला तो इवलासा अभ्रकाचा तुकडा, तिच्यासाठी लिहिलेलं “पत्र” झालं.
जे कि तिने दिलेल्या डायरीत, तिनेच लिहिलेल्या त्या एका पानाच्या मागे अजुनही पत्त्याविना तसेच आहे आणि माझ्यानंतरही अनंतकाळापर्यंत तसेच राहील.

©संदेश मुळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *